गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

आपला देश महान आहे.

१. 'कट्यार...' गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी 'हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे' असे म्हणतो आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो. ब्राह्मण 'मस्ट वॉच हं' चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात.

'अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?' म्हणणार्‍याला 'तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख' म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो.)

WeepingTricolor

२. सैराट गाजू लागला की फँड्री पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्‍या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर येतो. फेसबुक आणि वॉट्सअ‍ॅप वर तथाकथित उच्चवर्णीय जातींना, त्या जातीच्या कलाकारांना हिणवणार्‍या पोस्ट दिसू लागतात. पुन्हा पोलरायजेशन होऊन सैराट हा मराठा समाजाची बदनामी करणारा चित्रपट आहे म्हणून गदारोळ होतो, समाजात उभी फूट पडते. नागराज हा सार्‍या समाजाचा आयकॉन होऊ शकत होता तो एकाच समाजाच्या वर्तुळात बंदिस्त होतो.

३. भारतीय सैन्य पाकिस्तानवर स्ट्रॅटेजिक स्ट्राईक्स करते नि उरीच्या हल्ल्यासारखे पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रि-एम्टिव स्ट्राईक्स घेते. लगेच या निमित्ताने आपापल्या वैचारिक विरोधकांना हिणवण्याचे सत्र सुरू होते. थोडक्यात पुन्हा एकवार पार्ट्या पाडून कम्पल्सरी तू विरुद्ध मी चे खेळ सुरू होतात. आर्मीच्या जिवावर पूर्वी अंगाशी आलेला साहसवाद नि तेव्हा आपली जिरवणारे विरोधक यांचा हिशोब चुकता करणे सुरू होते.

मुळात 'आता हे कुठे आहेत', किंवा 'आता हे चूप बसतील' किंवा 'बसले आहेत' असे एकतर्फी जाहीर करताना आपण अशा नक्की किती लोकांना ओळखतो याचा विचार ही मंडळी करतात का?

बरं यात एखाद्याला पलिकडे ढकलून देऊन 'हे यश तुमचे नाही.' किंवा 'हे श्रेय तुमचे नाही' हे बजावण्यातून नक्की काय साधतो... तर साधतो हे की बूड न हलवता, काडीचे कष्ट न करता कट्यारच्या, नागराज मंजुळेंच्या, भारतीय लष्कराच्या यशाचे श्रेय आपण आपल्या पदरात बांधून घेऊ इच्छितो. त्यांच्यासाठी वाढलेल्या पंगतीत आपली ताटली घेऊन फुकटचे दोन घास गिळू इच्छितो इतकेच. एरवी कट्यारच्या निर्मितीत, नागराज मंजुळेंच्या यशात किंवा भारतीय लष्कराच्या वाटचालीत, उभारणीत आपला काडीचा वाटा नसतो. पण जिथे ऐतिहासिक व्यक्तींच्या यशावर दावे करत भांडतो आपण तिथे वर्तमानातल्या हाडामांसाच्या व्यक्तींचे काय.

सुज्ञ वाटणारी, ज्यांच्याकडून काही सकारात्मक घडेल असे वाटणारी अनेक मित्रमंडळी एक एक करून पाहता पाहता उन्मादी झालेली पाहिली. एकाचा ज्वर उतरत नाही तो दुसर्‍याचा अंतराळी जातो. देश महान होतो तो त्यातील माणसांमुळे. देश म्हणजे काही जमिनीचा तुकडा नव्हे, देश म्हणते त्यातील समाज. तो समाज सदैव लहान लहान तुकड्यात विभागला जात असताना आणि छुपे वा उघडपणे त्यात सामील होत लहान लहान वर्तुळात सुरक्षितता शोधणारे आणि त्यासाठी आवर्जून काही शत्रू निर्माण करत आपला गट राखणारे असताना हा देश महान आहे किंवा भविष्यात महान होण्याचीही काही शक्यता आहे यावर माझा काडीचाही विश्वास नाही. सतत एकमेकांवर आरोप केल्याशिवाय ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होत नाही ते कर्तृत्वशून्यच असतात हे समजून चालायचे असते. अशा माणसांकडून देश महान होण्याचे तर सोडाच, आहे असा राखणेही अवघड असते.

सध्याच्या परिस्थितीत मला तरी हा देश विखंडित होत जाताना दिसतो आहे. मी तुझी एक चूक, एक दोष दाखवला की दबा धरून बसायचे नि तुझी चूक, दोष दाखवून स्वतःला धन्य मानायचे या वृत्तीने जगणारे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत. विषवृक्षाच्या रुजवलेल्या मुळ्यांतून एवढा मोठा वृक्ष उभा राहिलाय की आता तो छाटणे कुणाच्याच हाती राहिलेले नाही. आपण फक्त तो रुजवला कोणी यावर जगाच्या अंतापर्यंत वाद घालत बसू. मला हे करायचे नाही.

हा समाज अंतर्बाह्य किडला आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे आणि त्याबाबत मी काही बोलू अथवा करू शकेन याची मला कणमात्र शक्यता वाटत नाही.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे

कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं 'असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी', पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते.

एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे 'विशेष आकर्षण' घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण 'सनी लिओन' असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप आहे म्हणतो मी. अजून त्यांचे नाव लोकांना ठाऊक आहे हे काय कमी आहे. असो.

जाता जाता: बाबांच्या 'मी अजून जहाज सोडलेले नाही!' मधला काही भाग...आजच्या काळाला बराचसा सुसंगत असा!
---

JwalaAaniPhule
मी: सामाजिक कार्यकर्ता ज्याला म्हणतात
तो एक माणूस!
पेटत्या मांसखंडांच्या प्रकाशात
रस्ता धुंडित नवे समाजकार्य जन्माला येईल
या एकाच उमेदीने मी
या अघोरी निर्णयाप्रत येऊन पोचलो होतो.

निर्णय घेणार्‍या केंद्रांची बेसुमार वाढ
हा लोकशाहीचा शाप आहे
सामान्य माणसाला तो थोडे स्वातंत्र्य
आणि पुष्कळसा गोंधळ देत असतो
शाश्वत मूल्यांनाही तो बाजारपेठेत आणतो
आत्मार्पणालाही दुकाने उघडायला लावतो
प्रत्येकाची ताकद ही गर्दी खेचणार्‍या
आवाजावर ठरत असते.

प्रतिभेला जाहिरातीवर खर्ची पडावे लागते
आणि गुणांना सौदेबाजीतही तरबेज असावे लागते.
विद्यापीठ चालवण्याची व्यवस्था
बंडखोर विद्यार्थी आपल्या हातात घेतात
पण त्यांना वेळापत्रकदेखील करता येत नाही!
स्वातंत्र्यदेवतेच्या राज्यात
बंदुका सिगारेटच्या पाकिटाएवढ्या सवंग होतात
आणि न्याय विकृतीच्या हातातही सहज येतो
आणि तो कोणत्याही देदिप्यमान बिंदूवर
माथेफिरूच्या निरागसपणाने डागला जाऊ शकतो
आणि ही गर्दी म्हणजे बहुमत
हे तरी खरे आहे का?
सडकेवरची बेफाम क्रान्ती
आणि मतपेट्यांतून बाहेर पडणारा मूक निर्णय
या ही दरी व तो कडा
एवढी तफावत असू शकते
हे नुकतेच मी वर्तमानपत्रातून वाचले आहे.

जेव्हा संकल्प रूप घेतील
आणि उद्याला आकार येईल
तेव्हा कदाचित त्यांना कळेल
की त्यांचे शत्रू वेगळे होते
हातापायांवर खिळे ठोकून घेताना
दु:ख होतेच होते
पण हेच खिळे कडा चढताना
पाय रोवण्याच्या कामी पडत असतात.

'समाजकार्या'ची ही आंबट कैरी
खाताखाता दात आंबून गेले आहेत
तरी ती सोडवत नाही
राजकीय पाणबुडे कोणत्या क्षणी
जहाजाला सुरुंग लावतील याचा नेम नाही
पण बुडण्याची खात्री वाटू लागली
तरी माझे हे जहाज मी सोडणार नाही
कारण त्यावर माझी सगळ्यात जास्त प्रीती आहे
बुडत्या जहाजाच्या कर्णधारालाही ओढ असते घराची
पण प्रसंग येतो तेव्हा घर बाजूला पडते.

जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात
तेथेच बुडता देश वाचवणार्‍या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात.

वाट पाहणार्‍या किनार्‍यांना
आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या
मी अजून जहाज सोडलेले नाही!

- बाबा आमटे 
- oOo -

हे वाचले का?

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तो कलकलाट होता...

काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. (जिथे लिहिला त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला.)

त्यात एक मुख्य धागा होता तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे रेफरेन्सेस देत ते लेखन अनेक ठिकाणी रेफर झाल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता.

ArnabWithABlowHorn

निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती.

खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्‍याचा आभास निर्माण करणे हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार आहे. आज याचे आणखी एक उदाहरण दिसते आहे. PoKमध्ये घुसून वीस अतिरेकी ठार मारून 'ऊरी'चा बदला घेतला अशा बातम्या अनेक पोर्टल्सवर दिसू लागल्या आहेत. आश्चर्य म्हणजे अजूनतरी एकाही बड्या वृत्तपत्रसमूहाने वा चॅनेलने याची दखल घेतली नसली, तरी आपल्याच गटातल्या दुय्यम चॅनेलच्या पोर्टलवर ही बातमी टाकून कितपत खपते आहे याची चाचपणी चालू झाली आहे.

प्रथम ही बातमी क्विंट्वर दिसली, मग 'कोब्रापोस्ट'वर (तरुण तेजपाल यांच्या अटकेनंतर 'रंग' बदललेला) . नुकतीच क्विंटचा हवाला देऊ ही बातमी ABP Majhaच्या वेबसाईटवर दिसू लागली आहे. कदाचित आता ती त्या चॅनेलवर येईल. फारसा गदारोळ झाला नाही, तर त्यांच्या हिंदी चॅनेलकडे सरकेल असा अंदाज आहे.

हा कालपर्यंतचा अपडेट. आज हीच बातमी क्विंटच्याच हवाल्याने 'दिव्य मराठी'ने नकाशा बिकाशा काढून दाखवत अधिक अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांचा अजेंडा राबवणारी 'फ्रस्ट्रेटेड इंडियन', इतकेच नव्हे तर डिफेन्सन्यूज.इन या नावाने जणू लष्कराची अधिकृत साईट असल्याचा आभास निर्माण करण्यार्‍या खासगी साईटनेही ही बातमी अहमहमिकेने दिली. चॅनेल्स बघणे मी बंद केल्याने तिकडे किती हुदाळ्या मारल्यात माहीत नाही.

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने अथवा कोणत्याही अधिकार असलेल्या व्यक्तीने याबाबत माहीती न देताही अशा तर्‍हेची बातमी दिली जात आहे. अर्थात संघटनांच्या कुजबूज ब्रिगेडकडे 'आमच्या आतल्या गोटातल्या बातमीनुसार' हे विनोदी कारण कायम हत्यार म्हणून असतेच. अधिकृत बातमी नंतर दिली जाईल अशी मखलाशीही केली जाऊ शकते. 'द डॉन' या पाकिस्तानच्या वृत्तपत्राने ही बातमी कशी दिली नाही?' या प्रश्नाला 'आपली हार ते कशी काय जाहीर करतील?' असे साडेअठ्ठावीस इंच फुलवलेल्या छातीने उत्तर दिले जाईल...

सगळं कसं सहज तर्क करण्याजोगे होऊ लागले आहे. लाज, लज्जा शरम सगळे गुंडाळून खोटारडेपणा चालू आहे. असंच चालू राहिलं तर या देशात काही दिवसांत केवळ 'तुमचं खोटं विरूद्ध आमचं खोटं' इतकंच शिल्लक राहील की काय अशी भीती वाटू लागली आहे. खरं काय हे कधीच कुणाला समजू शकणार नाही. जो तो आपल्या सोयीच्या खोट्यालाच खरे मानून चालू लागेल असे दिसते. थोडक्यात भक्तांचा डीएनए सर्वत्र पसरलेला दिसेल अशी शक्यता आहे. 

ही बातमी जर खोटी असेल तर या तीन वेबसाईट्सवर 'सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे वर्तन केल्याचा' ठपका ठेवून खटला भरणार की 'मन की बात' पसरवल्याबद्दल पद्मविभूषणची खिरापत वाटणार हे कोण सांगू शकेल? ट्विट करून विचारू का?

खोटे बोलण्यात काही लाज वाटून घेऊ नये असा संदेश थेट शीर्षस्थ व्यक्तींकडून दिला जात असल्याने जनतेने आणि त्यातही सनसनाटीपणावरच पोट भरता येते असे समजणार्‍या काही माध्यमांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळावे यात नवल नाही. अशा खोट्या बातम्या युद्धज्वर वाढवण्यास कारणीभूत होतात. 

एकदा हे पचते असे दिसले की जी प्रथितयश माध्यमे आहेत, नि ज्यांनी अजून ही बातमी दिली नाही, त्यांनाही 'स्पर्धेत टिकण्यासाठी' हे करावे लागणार आहे. त्यांची न्यूज पोर्टल्स पाहिली तर तिथे हेल्थ, लाईफस्टाईल आणि रोमान्स या तीन वेगवेगळ्या स्तंभशीर्षकाखाली जे सॉफ्ट पॉर्न निलाजरेपणे छापले जाते त्यावरून हे सहज लक्षात येईल.

यात दुसरा धोका आहे तो दस्तऐवजीकरणाचा. आज इंटरनेटच्या जमान्यात दहा ठिकाणी ही बातमी छापली गेली आहे. भविष्यातले 'खरा इतिहास' शोधणारे गल्लीबोळातले गुगलपंडित इतिहाससंशोधक इतक्या ठिकाणी बातमी दिसते म्हणून त्याचा अजाणता वा हेतुतः वापर करून आपले इतिहासाला आपल्या सोयीने वळवण्याचे आपले काम 'समरसतेने' करत राहतील.

दोन महत्त्वाचे मुद्दे, पुराव्याशिवाय अशा बातम्या देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करता येत नाही का? दुसरे, तुम्ही आम्ही 'शाहीद कपूरच्या मुलीचे नाव काय ठेवले किंवा करीना कपूरला कुठले डोहाळे लागले' अशा बातम्या चवीने वाचण्याइतके खुजे नि विचाराने किडके आहोत तोवर माध्यमे हा प्रकार करत राहणारच आहे.

या विशिष्ट केसमधे बातमी सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या सोयीची असल्याने त्याकडे - अनेकदा केला तसा - काणाडोळा केला जाईल हे उघड आहे. आपल्या देशातील समाजाची ओळख दिवसेंदिवस 'मला सोयीचे असत्य त्याला सत्य म्हणून मान्यता देणार्‍यांचा' अशी होते आहे. जात धर्मांवरच्या मारामार्‍या नि विच-हंटिंग तर नेहमीचेच.

दक्षिण पूर्व पुण्यातील, एकाच जमातीच्या चार टाळक्यांना एकत्र करून एक राजकीय पक्ष काढून स्वतःला 'राष्ट्रीय अध्यक्ष' वगैरे बिरुदे मिरवत फ्लेक्स लावणारा कुणी बाबा, त्याच्या फ्लेक्सवर झळकायला मिळाले म्हणून कृतकत्य होणारी नि त्याबद्दल आयुष्यात दादांसाठी कायप्पन म्हणत सतरंज्या उचलत धन्यता मानणारी मठ्ठ पोरटी, टीकेला उत्तर देण्यासाठी 'त्यांना सांगा की' आणि 'तेव्हा का नाही' हे दोन रामबाण हाती घेतलेले सारे निर्बुद्ध लोक गल्लीबोळात बार्गेनिंग पॉवर जमा करत आपला चार सेंटीमीटर स्वार्थ साधून घेताहेत नि वर राष्ट्रप्रेमाच्या पिचक्या डरकाळ्या फोडताहेत.

परक्या देशांकडे सतत 'एफडीआय वाढा वं माय' म्हणत हात पसरणारा, शेजार्‍याशी कचरा टाकण्यावरून भांडत बसणार्‍या माणसांचा हा देश महासत्ता होईल असे समजणारे निर्बुद्ध, मूर्ख आहेत नि आळशीही. त्या रम्य भूतकाळाच्या स्वप्नात नि रंगीत भविष्यकाळाच्या दिवास्वप्नात वर्तमानात त्यांना विचारहीन, सुखवस्तू जगायचे आहे.

संस्कृतीच्या बाता मारणारा हा देश १००% टक्के स्वार्थी आणि इहवादी आहे. कोण्या देवाच्या टाळक्यावर चार फुले वाहिल्यामुळे किंवा त्याच्या नावे सार्‍या समाजाला वेठीस धरणारे उत्सव साजरे करण्याने प्रगती होईल असे समजणारा बिनडोक समाज कधीच प्रगती करू शकत नसतो. आणि हे सांगणारे देशद्रोही असतात. 

जिथे अभ्यास करायचा तिथे विचार न करता रट्टे मारून पदव्या पदरी पाडून घेताना - आता तर विकतही सहज मिळतात - सोशल मीडियात मात्र अमक्याला 'घ्यायचाच' असे ठरवून त्याच्या पोस्ट, लेखनातून कीस पाडून गैरअर्थ काढून वाद घालणारे शूर मावळे फेसबुकवर असताना या देशाला वेगळ्या सैन्याची गरज काय? सोबतीला नुसत्या फोटोशॉपवर समाजसेवा नि बातम्या पसरवण्यावरच ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होते करणारे असे सत्ताधारी झाल्याने आनंदीआनंद झाला आहे.

या देशातील माझ्यासकट सगळ्या निर्बुद्धांचा विजय असो.

- oOo -

बातमी: Army Denies 'Cross-border Surprise raid'.


हे वाचले का?